Latest Post

Showing posts with label वाणिज्य. Show all posts
Showing posts with label वाणिज्य. Show all posts

टाटांची इंग्लंड स्वारी

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:12 AM

२,६५0 कोटींचा जग्वार लँडरोव्हर प्रकल्प उभारणार
नवी दिल्ली। दि. १९ - औद्योगिक जगतात टाटा मोटर्स आपला ठसा आणखी ठसठशीत करण्याच्या तयारीत असून, लवकर ब्रिटनमध्ये जग्वार लँडरोव्हरचा एक नवीन प्रकल्प उभारणार आहे. यासाठी ३५.५ कोटी पौंडची (जवळपास २,६५0 कोटी रुपये) गुंतवणूक केली जाणार आहे.
टाटा मोटर्सने २00८मध्ये ब्रिटनच्या जग्वार लँडरोव्हरची मालकी घेतली होती. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ब्रिटिश सरकारशी झालेल्या वाटाघाटीअंती जग्वार लँडरोव्हर प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कमी उत्सर्जन करणार्‍या इंजीनच्या उत्पादनासाठी मध्य ब्रिटनमधील स्टॅडफोर्डशायर येथे प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पात चार सिलिंडरच्या जेएलआर पेट्रोल आणि डिझेलआधारित इंजीनचे उत्पादन केले जाईल.
या प्रकल्पामुळे दोन हजार लोकांना रोजगार मिळेल. या वर्षी टाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत ३ टक्के वाढ झाली असून, जग्वार लँडरोव्हरच्या विक्रीत ३१ टक्के वाढ झाली आहे. जेएलआर भारतातही एक इंजीन प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करीत आहे.
जग्वार लँडरोव्हरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राल्फ स्पेथ यांनी सांगितले की, व्यवसायासंदर्भातील जेएलआरच्या धोरणान्वये आम्ही प्रगत इंजीनचे डिझाईन तयार करून त्याचे उत्पादन करणार आहोत. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता आणि हा प्रकल्प कधी पूर्ण होईल, याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही.

व्याजदराच्या चिंतेने बाजार पुन्हा धास्तावला

Written By Admin on Sunday, October 2, 2011 | 9:24 AM

स्रोत: तरुण भारत
मुंबई, ३० सप्टेंबर - देशात खाद्यान्न महागाईचा दर वाढल्याने रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदरात वाढ तर करणार नाही ना, या चिंतेने आज मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक तब्बल २४४ अंकांनी खाली आला. जागतिक बाजारातील मंदीचाही हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. कालच्या सत्रात निर्देशांकाने २५२ अंकांची कमाई केली होती. आज तो २४४.३१ अंकांनी खाली आला आणि १६,४५३.७६ वर स्थिरावला. या घसरणीमुळे निर्देशांकाची जुलै ते सप्टेंबर या तिमाहीतील घसरण ९.६ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या तीन वर्षातील ही विक्रमी घसरण मानली जात आहे. १७ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात खाद्यान्न महागाईचा दर वाढल्याने बाजाराला पुन्हा व्याजदरवाढीची चिंता सतावू लागली आहे. खुद्द अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही चिंता व्यक्त केल्याने गुंतवणूकदारांनी आपला हात आखडता घेतला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीतही आज ७२.२० अंकांची घसरण झाली. तो ४९४३.२५ वर बंद झाला. धातू, रिऍलिटी, बँक या क्षेत्रातील शेअर्स आज सर्वाधिक तोट्यात होते. बाजारातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी कंपनी इन्फोसिसचे शेअर्स आज ०.६४ टक्क्याने खाली आले. टाटा कन्सल्टन्सी, विप्रो या सॉफ्टवेअर निर्यात क्षेत्रातील शेअर्सही आज घसरले होते. जागतिक बाजारातील मंदीमुळे या कंपन्यांना फटका बसला. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अनिल अंबानी यांचे नाव संशयितांमध्ये आल्याने त्यांच्या समूहातील कंपन्यांनाही बरेच नुकसान सहन करावे लागले. आज धातू क्षेत्रातील शेअर्स सर्वाधिक तोट्यात राहिले. त्यापाठोपाठ रिऍलिटी, बँक आणि ऑटो क्षेत्राचा क्रमांक लागतो.

सणामुळे मागणी वाढल्याने सोने-चांदी चमकले

सणामुळे मागणी वाढल्याने सोने-चांदी चमकले
स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर - आशियाई बाजारातील स्थैर्य आणि देशांतर्गत बाजारात सणासुदीमुळे मागणी वाढल्याने सोने-चांदीचे दर आज वधारले होते. दिल्लीच्या सराफा बाजारात सोने २०० रुपयांनी वाढून २६,६४० वर बंद झाला. मागील दोन सत्रात सोन्याची किंमत ५७५ रुपयांनी खाली आली होती. चांदीचा भावही ८०० रुपयांनी वाढला. आज चांदी प्रतिकिलोमागे ५४,३०० रुपये या भावाने विकली गेली. मुंबईच्या सराफा बाजारातही आज सोने २५,९९५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. काल याचा भाव २५,६८५ इतका होता. शुद्ध सोनेही आज २६,१२० पर्यंत वधारले होते. चांदीचा भाव प्रति किलोमागे ५१,८०० रुपये इतका होता.

हिंदू विवाह समारंभ धार्मिक आयोजन नाही


स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, २ ऑक्टोबर - लग्नसमारंभात मांडव आणि शामियाना उभारणारे आणि अन्य सेवा देणारे आता करापासून स्वत:ला वाचवू शकणार नाहीत. दिल्ली उच्च न्यायालयाने, हिंदू विवाह समारंभ हे धार्मिक आयोजन नसल्याचे सांगून यावेळी मांडव आणि अन्य सेवा देणार्‍यांना सेवाकरातून सूट दिली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा दिला आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्र आणि न्या. संजीव खन्ना यांच्या न्यायासनाने ऑल इंडिया टेंट डीलर्स वेलफेअर ऑर्गनायजेशनची याचिका फेटाळून लावीत हा निकाल दिला. या ऑर्गनायजेशनने म्हटले होते की, लग्नसमारंभ हे धार्मिक आयोजन असल्याने यासाठी मांडव घालण्यासंदर्भात आपल्यावर सेवाकर लादला जाऊ नये. केवळ सेवाकर लावण्यासाठी याला सामाजिक कार्यक्रम म्हटले जाऊ शकत नाही.
न्यायालयाने मात्र हा युक्तिवाद फेटाळून लावला आणि मांडव घालणार्‍यांना सेवाकरातून मुक्तता नाही, हेही स्पष्ट केले.
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger