Latest Post

Showing posts with label ठळक बातम्या. Show all posts
Showing posts with label ठळक बातम्या. Show all posts

अडवाणींचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Written By Admin on Monday, October 10, 2011 | 2:54 AM


नवी दिल्ली - लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळावरून आपली रथयात्रा सुरू करण्यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भ्रष्टाचारविरोधी रथयात्रा काढत असलेल्या अडवाणी यांनी युपीए सरकार भ्रष्टाचारासाठी जबाबदार असल्याचे सांगितले आहे. या सरकारच्या काळात लोकशाहीची हानी झाली असून सर्वत्र भ्रष्टाचार फोफावलेला दिसत आहे. हेच कारण आहे की देशातील जनतेत असंतोष व संताप भरलेला आहे. परदेशात असलेला काळा पैसा भारतात परत आणण्यात सरकारने जी निष्क्रियता दाखवली आहे त्यामुळे जनतेत या सरकारविषयीचा विश्‍वास कमी झाला आहे.
रथयात्रेपूर्वी दिल्लीत एका पत्रपरिषदेत बोलताना अडवाणी म्हणाले की रथयात्रेदरम्यान भ्रष्टाचाराच्या मुद्याबरोबरच महागाई, निवडणूक सुधारणा या मुद्यांवरदेखील भर देण्यात येणार आहे. काळा पैसासंदर्भात श्‍वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करत रथयात्रेत विदेशातील काळा पैसा परत आणण्यासंदर्भात व यात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले.
स्रोत: तरुण भारत, 10/10/2011

गझल सम्राट जगजीतसिंह कालवश

 मुंबई - प्रख्यात गझल गायक जगजीतसिंह यांचे आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
जगजीतसिंह यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या मखमली आवाजामुळे गझल गायकीत त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही गाणे गायले होते.
जगजीतसिंह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानच्या गंगानगरमध्ये झाला होता. बालपणीच त्यांना संगीताचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. १९६५ मध्ये ते मुंबईत आले आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला. आपल्या मेहनतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत लवकरच आपले स्थान निर्माण केले. आपल्या गाण्याच्या शैलीने त्यांनी रसिकांना भुरळ घातली आणि रसिक त्यांच्या गाण्याचे दिवाने झाले. सामान्य माणसाला गझलची आवड जगजीतसिंह यांच्यामुळे निर्माण झाली. गझलसारखा कठीण उर्दूतला प्रकार त्यांनी रसिकांसाठी उलगडून दाखवला.
‘प्रेमगीत’, ‘अर्थ’ या चित्रपटातील गाणी कोण विसरू शकेल. त्यांनी अनेक गझल अलबम तयार केले. त्यांच्या प्रत्येक अलबमने यशाचे शिखर गाठले. आपल्या एकुलत्या मुलाच्या निधनाने कोलमडलेले जगजीतसिंह पुन्हा बळाने उभे राहिले आणि त्यांनी संगीतक्षेत्रात आपले संशोधन सुरू केले. त्यांचे संगीतक्षेत्रातील योगदान अमूल्य आहे.

गझल प्रकाराला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात जगजीतसिंह यांचे मोठे योगदान होते. त्यांनी ५० पेक्षा जास्त अलबममध्ये गाणी गायली आहेत. त्यात गझलचे प्रमाण जास्त आहे. तुमको देखा तो ये खयाल आया, होठों से छुलो तुम मेरा गीत अमर कर लो, वो कागज की कश्ती वो बारीश का पानी या त्यांच्या गझल फारच लोकप्रिय झाल्या. हिंदीबरोबरच त्यांनी पंजाबी, बांगला, उर्दू, गुजराती, सिंधी आणि नेपाळी भाषेत गाणी व गझल गायल्या आहेत. २००३ मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्भूषण पुरस्काराने सन्मानित केले.


गझल गायकीला नवा आयाम देणार्‍या या सम्राटाला अभिवादन.
स्रोत: तरुण भारत, तारीख: 10/10/2011  http://vrittabharati.in/

दलाई लामा यांना गांधी शांतता पुरस्कार

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 10:05 AM

जोहान्सबर्ग, २ ऑक्टोबर
altतिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर झाला असून येत्या रविवारी डर्बन शहरात होणाऱ्या समारोहात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार स्वीकारण्यासाठी दलाई लामा यांना दक्षिण आफ्रिका सरकारने व्हिसा मंजूर करावा, अशी विनंती महात्मा गांधी यांच्या नात ईला गांधी यांनी केली आहे. चीनच्या दबावामुळे दक्षिण आफ्रिका सरकार ७६ वर्षीय लामा यांना व्हिसा मंजूर करण्याची शक्यता सध्यातरी अंधुक आहे. दलाई लामांचा प्रस्तावित दक्षिण आफ्रिका दौरा त्यामुळे संकटात आला आहे.

सेरेना, जोकोविचचे धुव्वाधार विजय

न्यूयॉर्क - सेरेना विल्यम्स आणि नोव्हाक जोकोविच यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठताना धुव्वाधार विजय मिळविले. जोकोविचने अर्जेंटिनाच्या कार्लोस बर्लोक्‍यूविरुद्ध दोनच; तर सेरेनाने हॉलंडच्या मिशेला क्रॅंज्जेकविरुद्ध एकच गेम गमावला. सेरेनाने पहिल्या फेरीत दोनच गेम गमावले होते. सेरेनासमोर व्हिक्‍टोरिया अझारेन्काचे आव्हान असेल. "नंबर वन' कॅरोलिन वॉझ्नीयाकीनेही अरांता रुसविरुद्ध दोनच गेम गमावले.
जोकोविचने यंदाच्या मोसमात दोनच सामने गमावले आहेत. या स्पर्धेपूर्वी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती; पण आता त्याने विलक्षण तंदुरुस्ती पुन्हा कमावल्याचे दिसून आले. 74व्या स्थानावर असलेल्या बर्लोक्‍यूला पहिला गेम जिंकून खाते उघडण्यासाठी एक तास सहा मिनिटे इतकी दीर्घ वाट पाहावी लागली. बर्लोक्‍यू 28 वर्षांचा असून, त्याने 50व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. त्याचा खेळ अगदीच खराब झाला नाही; पण जोकोविचचा धडाकाच थक्क करणारा होता. त्याने बेसलाइनवरून वेग आणि अचूकता राखली. त्याची सर्व्हिस छान झाली; तसेच परतीचे फटकेही चांगले बसले. बर्लोक्‍यूने तिसऱ्या सेटमध्ये एक ब्रेक नोंदवून थोडाफार दिलासा दिला.
"व्यावसायिक टेनिसपटू...'
जोकोविच म्हणाला, ""आम्ही व्यावसायिक टेनिसपटू आहोत. आमच्यासमोर आव्हान असते आणि ते अर्थातच जिंकण्याचे असते. मी बर्लोक्‍यूला ओळखतो. तो चांगला तरुण आहे. तिसऱ्या सेटच्या मध्यास मला त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. तो कसून प्रयत्न करीत होता. लढाऊ खेळाबद्दल मला त्याचे कौतुक करावे लागेल.'' रॉजर फेडररने 93व्या स्थानावरील इस्राईलच्या ड्यूडी सेला याच्यावर 77 मिनिटांत मात केली. यानंतर त्याची क्रोएशियाच्या मरिन चिलीचशी लढत आहे.
81 "वीनर्स', चुकाही तेवढ्याच
सातव्या मानांकित फ्रान्सच्या गेल मॉंफीसचे आव्हान मात्र संपुष्टात आले. स्पेनच्या जुआन कार्लोस फेरेरोकडून तो पाच सेटमध्ये पराभूत झाला. पाच तास चाललेल्या लढतीत मॉंफीसने 21 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याने 81 "वीनर्स' मारले; पण टाळता येण्यासारख्या चुकासुद्धा (अनफोर्स्ड एरर्स) तेवढ्याच केल्या. फेरेरोने "लव्ह'ने सर्व्हिस राखत विजय साकार केला. त्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवीत दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले.
निकाल ः महिला एकेरी ः सेरेना विल्यम्स वि.वि. मिशेला क्रॅज्जेक 6-0, 6-1. कॅरोलिन वॉझ्नीयाकी वि.वि. अरांता रूस 6-2, 6-0. व्हिक्‍टोरिया अझारेन्का वि.वि. जिसेला डुल्को 6-4, 6-3. एलेना यांकोविच वि.वि. एलेना डॉकीच 6-3, 6-4. फ्रान्सिस्का शियावोनी वि.वि. मिरीयाना ल्युचीच 6-1, 6-1. अँड्रीया पेट्‌कोविच वि.वि. जीए झेंग 3-6, 6-3, 6-3.
पुरुष एकेरी ः नोव्हाक जोकोविच वि.वि. कार्लोस बर्लोक्‍यू 6-0, 6-0, 6-2. रॉजर फेडरर वि.वि. ड्यूडी सेला 6-3, 6-2, 6-2. मरिन चिलीच वि.वि. बर्नार्ड टॉमीच 6-1, 6-0, 6-2. जुआन कार्लोस फेरेरो वि.वि. गेल मॉंफीस 7-6 (7-5), 5-7, 6-7 (5-7), 6-4, 6-4. मार्डी फिश वि.वि. मॅलेक जझिरी 6-2, 6-2, 6-4. टोमास बर्डीच वि.वि. फॅबिओ फॉग्नीनी 7-5, 6-0, 6-0. ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा वि.वि. सर्जी बुब्का ज्युनिअर 6-3, 7-5, 6-2.
6-0, 6-0, 6-0 विजय
ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीत एकही गेम न गमावता विजय मिळविण्याचा पराक्रम यापूर्वी स्पेनच्या सर्जी ब्रुगेराने केला होता. फ्रान्सच्या थिएरी चॅंपीयनवर त्याने 6-0, 6-0, 6-0 अशी मात केली होती. जोकोविचचा हा विक्रम थोडक्‍यात हुकला.

साईना नेहवालचे आव्हान संपुष्टात

टोकियो - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिची जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी घोडदौड शनिवारी खंडित झाली. उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आठव्या मानांकित जर्मनीच्या ज्युलियन श्‍नेक हिने चतुर्थ मानांकित साईनावर 21-19, 21-10 अशी मात केली. साईनाच्या पराभवामुळे या स्पर्धेच्या एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
साईना विरुद्ध ज्युलियन हा सामना 39 मिनिटे चालला. पहिल्या गेममध्ये साईनाने चांगली लढत दिली. सुरवातीपासून दोन्ही खेळाडूंची बरोबरीच होती. मात्र, 19-19 असे गुण झाले असताना ज्युलिअनने सलग दोन गुण जिंकत पहिला गेम आपल्या नावे केला. पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिल्यानंतर दुसरा गेमही चुरशीचा होईल, असे वाटत होते. दुसऱ्या गेमच्या सुरवातीला दोघींचेही गुण सारखेच होते. पण 10-10 अशी बरोबरी असताना ज्युलिअनने
सलग अकरा गुण जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यामध्ये ज्युलिअनने नेटजवळ चपळाईने खेळ करत साईनाची दमछाक करण्यावरच भर दिला. याआधी साईना आणि ज्युलिअनमध्ये सात लढती झाल्या होत्या. त्यामध्ये साईनाने पाच विजय मिळविले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये प्रथमच साईनाला आठव्या मानांकित ज्युलिअनकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. साईना जागतिक क्रमवारीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
 खालावलेला फॉर्म चिंताजनक नाही साईनाची कामगिरी सध्या खालावली असली, तरीही त्यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही, असे मत भारताचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""गेल्या वर्षी तिची कामगिरी चांगली झाली होती. या वर्षी कामगिरी काहीसी खालावली आहे. पण तरीही यात चिंताजनक काही नाही. फॉर्ममध्ये नसूनही ती सहज उपांत्य फेरीपर्यंत धडक मारत आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर तिच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, सध्या तिच्याकडून अगदी किरकोळ चुका होत आहेत. थोड्याशा सरावाने या त्रुटी दूर होतील आणि साईना पुन्हा दर्जेदार कामगिरी करू शकेल.''

आफ्रिदीचं डोकं फिरलंयः दादा गांगुली

कोलकाता - शोएब अख्तरची बॉलिंग खेळताना सचिनचे पाय लटपटताना आपण पाहिलेत, असा दावा करणा-या शाहिद आफ्रिदीला ‘दादा’ सौरव गांगुलीनं एकाच वाक्यात उडवून लावलंय. आफ्रिदीचं डोकं फिरलंय, असा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ हाणून दादानं हा विषयच मिटवून टाकलाय.
‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणा-या शोएब अख्तरचं 'काँट्रव्हर्शली युवर्स ' हे आत्मचरित्र भारीच वादग्रस्त ठरलंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर माझी बॉलिंग खेळताना घाबरायचा, अशी गरळ शोएबनं आपल्या पुस्तकात ओकली होती. पण हे विधान त्याच्याच अंगाशी आलं होतं. सगळ्यांच रथी-महारथी क्रिकटपटूंनी त्याला अक्षरशः फोडून काढलं होतं. असं असताना, काल पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि शोएब बोलतोय त्यात तथ्य असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिली.
शोएबचा सामना करताना सचिनचे पाय अक्षरशः कापत असल्याचं मी फिल्डिंग करताना पाहिलंय, असा शाहिद आफ्रिदीनं केला होता. त्याबद्दल गांगुलीला विचारलं असता, आफ्रिदीचं डोकं फिरलंय अशी प्रतिक्रिया त्यानं दिली.
दरम्यान, भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंगला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांतून वगळण्याचं ‘दादा’ ला फारसं आश्चर्य वाटत नाहीए. भज्जीच्या खराब फॉर्ममुळेच त्याला संघात स्थान मिळालं नसावं, असं त्यानं नमूद केलं. परंतु, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत हरभजशिवाय खेळणं शक्यच नसल्याचं सांगत त्यानं भज्जीच्या क्षमतेबद्दल विश्वास व्यक्त केला.

बापूंच्या पुतळ्यासमोर सरकारला सुबुद्धी देण्याची प्रार्थना

मुंबई, २ ऑक्टोबर
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न एक महिन्यात सोडविण्याचे आश्वासन देऊन दोन महिने झाले तरी अद्याप कोणतीच हालचाल न करणाऱ्या सरकारला सुबुद्धी द्या, अशी प्रार्थना आज सुमारे दोन हजार गिरणी कामगारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन केली. येत्या मंगळवारी सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गिरणी कामगारांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्याची सुबुद्धी विरोधी पक्षीयांनादेखील व्हावी, असे साकडेही या कामगारांनी महात्माजींना घातले. गिरणी कामगारांच्या घरांच्या रेंगाळलेल्या प्रश्नावर मंगळवारच्या बैठकीत काय तोडगा निघतो, याकडे आता हजारो गिरणी कामगारांचे लक्ष लागले आहे.
कामगारांना घरे देण्याच्या मागणीवरून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन गाजले. गिरणी कामगारांच्या मोर्चास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, भाजपचे विनोद तावडे, रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले आदी नेत्यांनी शक्तिनिशी जोरदार पाठिंबा दिला होता. नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महिन्यांत हा प्रश्न सोडविण्याचे जाहीर केले. मात्र, पात्रतेचे निकष, घरांची संख्या, किंमत आदी मुद्दय़ावर अद्यापही कोणताच निर्णय न झाल्याने अखेर आज गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर आले. या प्रश्नावर येत्या  मंगळवारी सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यासंबंधीचे पत्र सरकारतर्फे गिरणी कामगारांच्या संबंधित नेत्यांना अगोदरच पाठविण्यात आल्याने, सरकारविरोधी निदर्शनांऐवजी, प्रार्थना मेळावा आयोजित करून ‘गांधीगिरी’चा मार्ग आज गिरणी कामगारांनी अवलंबिला. त्याआधी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या कामगारांची भेट घेऊन कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली.
आता येत्या मंगळवारच्या बैठकीत विरोधी पक्ष या मुद्दय़ावर कोणती भूमिका घेतात, यावर या प्रश्नाते भवितव्य अवलंबून असल्याचे कामगार नेत्यांचे मत आहे. सभा-मोर्चासमोर घोषणा देणे वेगळे, आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग भाग पाडणारी भूमिका घेणे वेगळे, त्यामुळे, मंगळवारी विरोधी पक्षांची भूमिका मंगळवारी अधिक निर्णायक ठरेल, असे मत गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी व्यक्त केले.

ममता बॅनर्जींचा दणदणीत विजय

कोलकता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार नंदिनी मुखर्जी यांचा पराभव केला.
पश्‍चिम बंगालमध्ये गेल्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा पराभव करून तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आला होता. रेल्वेमंत्री असलेल्या बॅनर्जी यांनी दिल्ली सोडून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. सहा महिन्यात निवडून यायचे असल्याने त्यांनी भवानीनगरमधून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. या मतदारसंघाचे आमदार सुब्राता बॅनर्जी यांनी राजीनामा दिल्याने येथे गेल्या 25 सप्टेबररोजी पोटनिवडणूक झाली. ममता बॅनर्जी यांचा 54,213 हजार मतांनी दणदणीत विजय झाला.

'लेटर बॉम्ब' माझा नाही - प्रणव

दिल्ली केंद्रीय अर्थ मंत्रालयाने टू जी स्पेक्ट्रमसंदर्भात पाठवलेले संबंधित पत्र खुद्द पंतप्रधान कार्यालयासह विविध मंत्रालये व न्यूज चॅनेल्स यांनी या प्रकरणी केलेल्या टिप्पणींचे सारांश होते व त्यात आपल्या व्यक्तिगत मताचा समावेश नव्हता , असे स्पष्ट करणारे ' नवे पत्र ' केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवले असून केंद्रीय गृहमंत्री पी . चिदंबरम यांच्याभोवतीचा वेढा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलेला ' लेटर बॉम्ब ' फुसका ठरवण्याचा प्रयत्न अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केला .
'टूजी स्पेक्ट्रम घोटाळा तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम टाळू शकले असते ' अशी टिप्पणी असलेले पत्र अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवल्याचे नुकतेच आरटीआयअंतर्गत उघड झाले आहे . त्यावरून निर्माण झालेल्या रणकंदनामुळे यूपीएभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले . या सर्व पार्श्वभूमीवर अर्थमंत्री मुखर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात वरील मत व्यक्त करत चिदंबरम यांना वेढ्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला .
प्रणव - पंतप्रधान - सोनिया भेट ?
टूजी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाला नवरात्रीच्या मुहूर्तावर तिलांजली देऊन यूपीएत सारे काही आलबेल असल्याची ग्वाही देशवासीयांना द्यावी यासाठी प्रणव मुखर्जी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटणार असल्याची चर्चा बुधवारी राजधानीत होती . पंतप्रधान व सोनिया गांधी यांच्यातही चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट होत होते . अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर प्रणव व पंतप्रधान यांची प्रत्यक्षात भेट झालेली नाही , हे विशेष !
पंतप्रधानांच्या जेवणावळीत चिदंबरम !
टू जीवरून महाभारत रंगले असतानाच गृहमंत्री पी . चिदंबरम यांनी मात्र बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला . ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यासाठी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभात पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातील दोनच सहकाऱ्यांना आमंत्रित केले होते . त्यात चिदंबरम यांचा समावेश होता . माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनीही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या .
' सरकारच्या कमार् ' वरून हमरातुमरी
दरम्यान , टूजी प्रकरणावरून यूपीएला कोंडीत पकडण्याची संधी भाजपने बुधवारीही साधलीच . यूपीएला पाच वर्षांचा जनादेश आहे , या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर ' हे सरकार आपल्या कर्मानेच पडणार आहे ' अशी प्रतिक्रिया सुषमा स्वराज व अरुण जेटली यांनी व्यक्त केली . काँग्रेसनेही त्यास चोख प्रत्युत्तर देताना टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाशी संबंधित सुब्रमण्यम स्वामींच्या याचिकेची सुनावणी कोर्टात सुरू आहे . स्वामींतर्फे जो युक्तिवाद केला जातो त्यातला शब्दही न बदलता भाजप प्रसिद्धीपत्रके तयार करते . कोर्टाने अद्याप कोणताही निकाल दिलेला नाही , त्यापूर्वीच भाजपला स्वत : चा काल्पनिक निकाल ऐकवायची घाई झाली असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी हाणला .

कॉंग्रेसचे दात घशात घालू - उद्धव ठाकरे

मुंबई - मुंबई महापालिकेचे विभाजन करण्याच्या मागणीवरून आज शिवसेना, भाजप व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सर्वच विरोधकांनी टीकेचे रान उठविले. मुंबई तोडण्याची भाषा करणाऱ्यांचे दात त्यांच्याच घशात घालू, असा सडेतोड इशारा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एकीकडे दिला; तर हे पिल्लू ज्याने कोणी सोडले तो पुढे येऊ दे, मग मी बोलतो, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. भाजप लोकशाही मार्गाने या मागणीस विरोध करेल, असे भाजपचे मुंबई अध्यक्ष गोपाळ शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही या मागणीला ठाम विरोध दर्शविला असून, मुंबई महापालिकेच्या विभाजनाची आवश्‍यकता नसल्याचे ठाम मत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई महापालिकेचे शहर व उपनगर असे विभाजन करावे व उपनगरासाठी स्वतंत्र आयुक्त नेमावा, अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी काल सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत केली होती. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या साक्षीने करण्यात आलेल्या या मागणीला शिवसेनेने कडाडून विरोध केला. आज यावर सर्वच राजकीय पक्षांनी तीव्र शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
दात घशात घालू - उद्धव ठाकरे
कॉंग्रेसचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, हे या मागणीवरून सिद्ध होते. कॉंग्रेसच्या नेत्यांशीच लढून मराठी माणसाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळविला. आज संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात कॉंग्रेसकडून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतो हे महाराष्ट्राचे दुर्दैव. कॉंग्रेसचा हा डाव शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही. कॉंग्रेसचे हे दात घशात घातल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, अशी टीकेची झोड शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उठविली.
मुंबईचे पालकत्व एकाच संस्थेकडे ठेवायला हवे हे आम्ही खूप वर्षांपासून सांगत आलो आहोत. मुंबईतील सर्व बाबींसाठी जर महानगरपालिकेला जबाबदार धरले जात असेल, तर महानगरपालिकेला तसे अधिकारही द्यायला हवेत. याउलट एमएमआरडीएसारख्या संस्था महानगरपालिकेच्या डोक्‍यावर राज्य करतात. कॉंग्रेसची ही पद्धत आहे, की एखाद्या छोट्या माणसाकडून पुडी सोडायची आणि क्रिया-प्रतिक्रिया काय होतात ते पाहायचे. कॉंग्रेसचा मुंबई महाराष्ट्रापसून तोडण्याचा हा डाव मुंबईतील मराठी माणूस आणि शिवसेना कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

पुन्हा बाबा रामदेवांचा हल्लाबोल

स्रोत: तरुण भारत 
फारूखाबाद, ३ ऑक्टोबर
भ्रष्टाचार आणि विदेशात असणारा काळा पैसा परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या  निष्क्रियतेवर पुन्हा एकदा रामदेव बाबांनी हल्लाबोल केला आहे. जे लोक काळा पैसा परत आणण्यात बाधा आणत आहेत, त्यांचाच काळा पैसा या विदेशी बँकांमध्ये जमा असून शकतो, अशी टीका केंद्र सरकारवर रामदेव बाबांनी केली आहे.
‘भारत स्वाभिमान यात्रा’वर असणार्‍या रामदेवबाबांनी आज सकाळी योगशिक्षण दिल्यानंतर केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. काळा पैसा भारतात परत आणण्यामध्ये अडचणी आणणार्‍या लोकांचाच पैसा विदेशी बँकांमध्ये जमा असू शकतो. असे नसते देशाच्या विकासासाठी हा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असते.
भ्रष्टाचाराचा मुद्दा खूप मोठा असून या भ्रष्टाचारात अडकलेल्या मोठ्या लोकांची नावे आश्‍चर्यकारकपण समोर येत आहेत. भ्रष्टाचाराने देश पोखरत चालला आहे. देशात वाढणार्‍या महागाईचे कारणदेखील भ्रष्टाचारच आहे. निष्क्रिय लोकांच्या हाती देशाची सत्ता असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger