Latest Post

Showing posts with label छायादालन. Show all posts
Showing posts with label छायादालन. Show all posts

आशा भोसलेंना अक्षय मोहंती सन्मान

Written By Admin on Monday, October 10, 2011 | 3:02 AM


भुवनेश्‍वर - प्रख्यात पार्श्‍वगायिका आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाच्या अतिशय प्रतिष्ठेच्या अक्षय मोहंती सन्मानसाठी निवड करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि कार्याचा गौरव करणारे विशेष पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रख्यात ओरिया गीतकार आणि संगीतकार अक्षय मोहंती यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या १२ ऑक्टोबर रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी मन्ना डे, गुलजार आणि इलिया राजा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
स्रोत: तरुण भारत, 10/9/2011 http://vrittabharati.in/

अडवाणींचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल


नवी दिल्ली - लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळावरून आपली रथयात्रा सुरू करण्यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भ्रष्टाचारविरोधी रथयात्रा काढत असलेल्या अडवाणी यांनी युपीए सरकार भ्रष्टाचारासाठी जबाबदार असल्याचे सांगितले आहे. या सरकारच्या काळात लोकशाहीची हानी झाली असून सर्वत्र भ्रष्टाचार फोफावलेला दिसत आहे. हेच कारण आहे की देशातील जनतेत असंतोष व संताप भरलेला आहे. परदेशात असलेला काळा पैसा भारतात परत आणण्यात सरकारने जी निष्क्रियता दाखवली आहे त्यामुळे जनतेत या सरकारविषयीचा विश्‍वास कमी झाला आहे.
रथयात्रेपूर्वी दिल्लीत एका पत्रपरिषदेत बोलताना अडवाणी म्हणाले की रथयात्रेदरम्यान भ्रष्टाचाराच्या मुद्याबरोबरच महागाई, निवडणूक सुधारणा या मुद्यांवरदेखील भर देण्यात येणार आहे. काळा पैसासंदर्भात श्‍वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करत रथयात्रेत विदेशातील काळा पैसा परत आणण्यासंदर्भात व यात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले.
स्रोत: तरुण भारत, 10/10/2011

गझल सम्राट जगजीतसिंह कालवश

 मुंबई - प्रख्यात गझल गायक जगजीतसिंह यांचे आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
जगजीतसिंह यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या मखमली आवाजामुळे गझल गायकीत त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही गाणे गायले होते.
जगजीतसिंह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानच्या गंगानगरमध्ये झाला होता. बालपणीच त्यांना संगीताचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. १९६५ मध्ये ते मुंबईत आले आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला. आपल्या मेहनतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत लवकरच आपले स्थान निर्माण केले. आपल्या गाण्याच्या शैलीने त्यांनी रसिकांना भुरळ घातली आणि रसिक त्यांच्या गाण्याचे दिवाने झाले. सामान्य माणसाला गझलची आवड जगजीतसिंह यांच्यामुळे निर्माण झाली. गझलसारखा कठीण उर्दूतला प्रकार त्यांनी रसिकांसाठी उलगडून दाखवला.
‘प्रेमगीत’, ‘अर्थ’ या चित्रपटातील गाणी कोण विसरू शकेल. त्यांनी अनेक गझल अलबम तयार केले. त्यांच्या प्रत्येक अलबमने यशाचे शिखर गाठले. आपल्या एकुलत्या मुलाच्या निधनाने कोलमडलेले जगजीतसिंह पुन्हा बळाने उभे राहिले आणि त्यांनी संगीतक्षेत्रात आपले संशोधन सुरू केले. त्यांचे संगीतक्षेत्रातील योगदान अमूल्य आहे.

गझल प्रकाराला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात जगजीतसिंह यांचे मोठे योगदान होते. त्यांनी ५० पेक्षा जास्त अलबममध्ये गाणी गायली आहेत. त्यात गझलचे प्रमाण जास्त आहे. तुमको देखा तो ये खयाल आया, होठों से छुलो तुम मेरा गीत अमर कर लो, वो कागज की कश्ती वो बारीश का पानी या त्यांच्या गझल फारच लोकप्रिय झाल्या. हिंदीबरोबरच त्यांनी पंजाबी, बांगला, उर्दू, गुजराती, सिंधी आणि नेपाळी भाषेत गाणी व गझल गायल्या आहेत. २००३ मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्भूषण पुरस्काराने सन्मानित केले.


गझल गायकीला नवा आयाम देणार्‍या या सम्राटाला अभिवादन.
स्रोत: तरुण भारत, तारीख: 10/10/2011  http://vrittabharati.in/

लोकमनावर अधिराज्य गाजवणारा आवाज

Written By Admin on Tuesday, October 4, 2011 | 9:31 AM

सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही; तो आवाज चैतन्य निर्माण करू शकत नाही अशी कुठलीच मैफिल नाही: त्या गळ्याला त्याज्य आहे असा कुठलाच संगीत-प्रकार नाही असे म्हटले जाते.
त्यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी भावंडांचे मार्गदर्शन व त्यांची साथ या सगळ्यांतून आशाताईंचा गळा घडत गेला.
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात ‘माझा बाळ’ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत. त्या काळात हिंदी चित्रपटसंगीतावर लता मंगेशकर, शमशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करत होत्या. त्यामुळे आशाताईंना संधी मिळणे अवघड होते. या गायिकांच्या राज्यात राहून, गाऊन, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचे, स्वतःला सिद्ध करण्याचे फार मोठे आव्हान आशाताईंपुढे होते. या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, मुलांची जबाबदारी, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या विपरीत घटकांशी सामना करत करत आशाताईंनी ते आव्हान स्वीकारले आणि ते स्वबळावर, आत्मविश्वासाने यशस्वीपणे पेलून दाखवले.
इ.स. १९५७- इ.स. १९५८ हे वर्ष आशा भोसले यांचेच होते. सचिन देव बर्मन यांच्याकडे गाण्याची संधी त्यांना मिळाली. त्या संधीचे त्यांनी सोने केले. कालाबाजार, लाजवंती, नौ दो ग्यारह, चलती का नाम गाडी, सुजाता हे आणि असे असंख्य चित्रपट त्यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले. पुढची पाच दशके आशाताईंनी गाजवली. अनेक संगीतकारांबरोबर काम केले. अनेक कवींच्या काव्यरचनांना सुरांचे कोंदण दिले. एवढेच नाही तर आपल्या गाण्यांबरोबर त्या चित्रपटांना, त्यांतल्या अभिनेत्रींनादेखील अजरामर केले.
ओ. पी. नय्यर आणि आशाताई एक अफलातून जोडी होती. इ.स. १९६० च्या सुमारास नय्यर यांचे संगीत असणारे ‘ऑखोसे जो उतरी है दिलमे’ (फिर वही दिल लाया हूँ ) हे गाणे; इ.स. १९६५चे ‘जाइंये आप कहाँ’ (मेरे सनम); इ.स. १९६८ मधले ‘वो हसीन दर्द देदो’ (हम साया); चैन से हमको कभी -अशी मदहोश करणारी गाणी रसिकांच्या हृदयावर राज्य करायला लागली.
राहुल देव बर्मन यांच्याबरोबर काम करताना ‘पिया तू अब तो आजा’ हे इ.स. १९७१ चे कारवाँ चित्रपटातील गीत, इ.स. १९७१ चेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते ‘दम मारो दम’; ‘जाने जा’ हे इ.स. १९७२ चे जवानी दिवानीतले गाणे, ही गाणी आशा भोसलेंच्या आवाजाचा नवा बाज दाखवून गेली. इ.स. १९८१ चा ‘उमराव जान’ हा चित्रपट आशाताईंमधली गझल गायिका रसिकांसमोर घेऊन आला. आशाताईंचा आवाज, खय्याम यांचे संगीत आणि दिल चीज क्या है, इन आँखोंकी मस्तीसारखी शब्दरचना हे सगळेच जमून आले. ‘दिल चीज क्या है’ या गीताला इ.स. १९८१ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे ‘इजाजत’ चित्रपटातल्या ‘मेरा कुछ सामान’ या त्यांच्या गाण्यालाही इ.स. १९८६ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हिंदीबरोबर आशा भोसलेंची मराठी गाण्यांची कारकीर्द बहरतच होती. सुधीर फडके, हेमंत कुमार, लता मंगेशकर, सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल अशा गायक-गायिकांबरोबरची गाणी मराठी रसिकमनात घर करून राहिली आहेत. बा. भ. बोरकर, आरती प्रभू, ग. दि. माडगुळकर, शांता शेळके, सुरेश भट, सुधीर मोघे यांच्या कवितांबरोबर सौमित्रसारख्या नव्या दमाच्या कवींच्या कविताही आशाताईंच्याच आवाजात रसिकांपुढे आल्या. सर्व कवींच्या शब्दांना आशाताईंनी सुरेल न्याय दिला. तरुण आहे रात्र अजुनी, जिवलगा राहिले रे दूर, ही वाट दूर जाते, फुलले रे क्षण माझे, झिनी झिनी वाजे, गेले द्यायचे राहूनी, गंध फुलांचा गेला सांगून, आज कुणीतरी यावे, एका तळ्यात होती - अशा लोकप्रिय गीतांची यादी प्रचंड आहे. ‘रेशमाच्या रेघांनी’तला लावणीचा ठसका, ‘सैनिक हो तुमच्यासाठी’तला कृतज्ञता भाव, ‘केव्हा तरी पहाटे’तली हुरहुर, ‘जे वेड मजला लागले’ची गोडी, सगळेच विलक्षण!
त्यांनी ज्यांच्यासाठी गाणी गायली ते संगीतकार, ते गीतकार, त्या अभिनेत्री आणि आशा भोसलेंचा आवाज - या सर्वांच्या परस्परसंबंधांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या वर्णन करणे हे एक अशक्यप्राय काम आहे. त्याचबरोबर आशाताईंनी गायलेली चित्रपटगीते (मराठी, हिंदी व अन्य भाषांतील), भावगीते, गझल, भजने-भक्तिगीते इत्यादी गाण्यांची व संबंधित चित्रपटांची केवळ यादी करायची ठरवली, तरी ते एक आव्हानात्मक काम आहे.
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे. मधुबाला-मीनाकुमारीपासून ते अलीकडच्या तब्बू-उर्मिला मातोंडकर-ऐश्वर्या रायपर्यंतच्या अभिनेत्रींना त्यांनी आपला आवाज दिला आहे. त्यांनी मोहम्मद रफी, किशोर कुमार व सुधीर फडके यांच्याबरोबरचा काळ तर गाजवला आहेच, तसेच त्या आज हृषीकेश रानडे सारख्या तरुण गायकाबरोबरही गात आहेत. आशाताई आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांशी गायिका म्हणून जोडल्या गेल्या आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत.
नाच रे मोरा, आईए मेहेरबाँ, दिव्य स्वातंत्र्य रवी (नाट्यगीत), तनहा तनहा यहाँ पे जीना, जिवलगा राहिले रे दूर घर माझे, रंग दे मुझे रंग दे, सांज ये गोकुळी, जानम समझा करो, मागे उभा मंगेश... ही ‘रेंज’च अफाट आहे, हा आवाकाच अविश्वसनीय आहे. उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई आजही तेवढ्याच ताकदीने गाऊ शकतात.
कॅनडा, इंग्लंड, अमेरिका, स्वीडन आदी अनेक देशांत झालेले कार्यक्रम, परकीय संगीतकारांबरोबर केलेले काम, ‘राहुल अँड आय’ सारखा अल्बम, लेस्ली लुईसबरोबरचे काम असे अनेक नवनवे प्रयोग आशाताई आजही करतात. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, अभिनेता संजय दत्त यांच्याबरोबर गाण्याचा प्रयोग केला. ‘आशा अँड फ्रेन्ड्‌स’ या अल्बमचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला आहे. अभिजात संगीत कलेला जसे स्थळ-काळ-वेळाचे बंधन नाही, तसेच आशाताईंच्या आवाजालाही या कशाचेच बंधन नाही.
राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आणि नुकताच इ.स. २००८ मध्ये मिळालेला पद्मविभूषण पुरस्कार- हे पुरस्कार आशा भोसलेंना बहाल करण्यात आले आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये देण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कारही त्यांना देण्यात आला.
आशा भोसले या मंचावरून एक ‘उत्कृष्ट परफॉर्मर’ म्हणून रसिकांसमोर येतातच, पण त्या स्वयंपाकाची आवड असलेल्या, मुलांना सांभाळणार्‍या एक परिपूर्ण गृहिणी आहेत; क्रिकेटच्या दर्दी रसिक असलेल्या भारतीय नागरिक आहेत. एवढे यश, मानसन्मान मिळूनही पाय घट्टपणे जमिनीवरच असलेल्या, साधी राहणी असलेल्या स्त्री-कलाकार आहेत. इतर मंगेशकर भावंडांप्रमाणेच त्यांना वडिलांचा (दीनानाथांचा) अभिमान आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जुना काळ, प्रचंड कष्ट, धडपड, जुने सहकारी (सहगायक, संगीतकार, गीतकार, सहवादक, स्टुडिओतील कर्मचारी ... इत्यादी) या गोष्टी न विसरणार्‍या ,किंबहुना आवर्जून लक्षात ठेवणार्‍या आशाताई ह्या एक ‘संवेदनशील माणूस’ आहेत.

वाह उस्ताद...!

उस्ताद झाकीर हुसेन आणि त्याची जुगलबंदी रंगत जाते, दोघांचीही बोटं तितक्याच ताकदीने तबल्यावर थिरकतात, कोणीही मागे हटायला तयार नाही, अखेर समाधानी चेहऱ्याने झाकीर हुसेन म्हणतात 'वाह उस्ताद!' आणि त्यावर तो मुलगा म्हणतो, 'अरे हुजूर, वाह ताज बोलिये!' आठवते ती जाहिरात? ब्रूकबॉण्डच्या जाहिरातीतील तो लहान मुलगा म्हणजे आजचा आघाडीचा संगीतकार आदित्य कल्याणपूर...
घरात संगीताची कोणतीही पार्श्वभूमी नसताना शास्त्रीय संगीताची कास धरून आदित्यने केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपला ठसा उमटवला आहे. आदित्यचे वडील मेकॅनिकल इंजिनीअर, तर आई बालमोहन शाळेत कम्प्युटर डिपार्टमेंटची विभागप्रमुख. मात्र आपल्या मुलाला संगीताची, विशेषत: तबल्याची आवड आहे; हे त्यांनी जाणलं होतं. 'मी डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावं, अशी अपेक्षा माझ्या आई-वडिलांनी कधीच केली नव्हती आणि ते माझ्य दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं,' आदित्य अभिमानाने सांगतो.
साधारणपणे तीन वर्षांचा असतानाचा एक प्रसंग आदित्य आवर्जून नमूद करतो. 'एकदा चुकून माझा पाय तबल्याला लागला, तेव्हा आई मला ओरडली आणि तिने मला तबल्याला नमस्कार करायला सांगितला. तबल्यात देव असतो, असं तिने मला सांगितलं. त्यावर मी तिला विचारलं, कुठे आहे देव? ती म्हणाली तो तबल्याच्या आत असतो, दिसत नाही. त्यानंतर काही दिवसांनी तिला तबला फुटलेला दिसला. तिने मला विचारलं, तेव्हा मी सांगितलं, की मी तबला फोडला. कारण मला देव बघायचा होता. यावर तिला हसावं की रडावं तेच समजेना.' असं तबल्याशी आदित्यचं नातं जुळलं.
अगदी लहान असल्यापासून आदित्यला तालाचं ज्ञान होतं आणि हे त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी आदित्यला तबल्याचं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या सातव्या वषीर् आदित्यने उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे तबला शिकण्यास सुरुवात केली. 'वाह ताज'च्या जाहिरातीसाठी त्यांनीच आदित्यचं नाव सुचवलं होतं. शाळा, कॉलेज सुरू असतानाच आदित्यने उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबरोबर कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. कॉलेज म्हणजे फक्त आईच्या समाधानासाठी होतं, असं तो सांगतो. मात्र शाळा-कॉलेजमध्येही तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेत असे. अनेक स्पर्धा त्याने जिंकल्या होत्या. कॉलेज फेस्टिवल हे तरुणांना आणि त्यांच्या करियरला दिशा देणारे असतात, असं त्याला वाटतं. सिडनहॅम कॉलेजमध्ये दोन वर्षं शिकल्यानंतर मिठीबाई कॉलेजने त्याला स्वत:हून कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची विनंती केली होती. त्याने ती स्वीकारलीदेखील. कॉलेजातील त्याच्या बरोबरीची मुलं जेव्हा मजा करत होती, तेव्हा आदित्य दिवसाचे किमान ८ ते १० तास रियाज करत होता, कॉन्सर्ट करत होता.
आदित्यने आत्तापर्यंत उस्ताद झाकीर हुसेन, पंडित जसराज, उस्ताद अमजद अली खान, डॉ. प्रभा अत्रे, पंडित शिवकुमार शर्मा, शंकर महादेवन, ए. आर. रहमान अशा अनेक दिग्गजांबरोबर काम केलंय. त्याबद्दल बोलताना आदित्य म्हणतो, 'या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळणं म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच होती. या महान कलाकारांबरोबर काम करताना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि ती संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे.'
माझ्या गुरूंनी मला केवळ तबला शिकवला नाही, तर एक चांगला माणूस म्हणून जगणं शिकवलं आहे, असं तो सांगतो. पंजाब घराण्याची परंपरा पुढे चालवणाऱ्या आदित्यकडे उस्ताद झाकीर हुसेन यांचा वारसदार म्हणूनही पाहिलं जात आहे.
शास्त्रीय संगीतात करियर करणाऱ्या तरुणांची संख्या आजही खूप कमी आहे, आदित्यने मात्र ते धाडस केलं. तबल्याचा प्रसार करण्यासाठी त्याने अमेरिकेत 'न्यू इंग्लंड स्कूल ऑफ म्युझिक' स्थापन केली आहे. आजवर हार्वर्ड, एमआयटी, कॉनेर्ल, कोलंबिया, येल, बोस्टन, अशा अनेक युनिव्हसिर्टीजमध्ये त्याने आपली कला पेश केली आहे. हार्वर्ड विद्यापीठाची संगीत म्युझिक स्कूल आणि बोस्टनमधील रंगांजली स्कूल ऑफ म्युझिकमध्ये त्याला शिकवण्याचीही संधी मिळाली. एस्टोनियातील नावाजलेल्या 'ओरिएण्ट आर्ट फेस्टिव्हल'मध्ये तबलावादन करणारा आदित्य हा पहिला कलाकार आहे. जगभरातील नावाजलेल्या फेस्टिव्हल्समध्ये आदित्यने परफॉर्म केलं आहे. पण हे सगळं करताना रियाज, नवनवीन गोष्टी शिकणं, प्रयोग करणं, या गोष्टी आदित्यने सुरूच ठेवल्या. कॅन्सरमुळे आईचा मृत्यू झाल्यानंतर आदित्यने मुंबईत 'शामल म्युझिक फाऊंडेशन'ची स्थापना केली आहे. कॅन्सर पेशंटसाठी ही संस्था विविध उपक्रमांद्वारे निधी गोळा करते.
भारतीय कलांची परंपरा अतिशय समृद्घ आहे. अनेक दशकांपूवीर् होऊन गेलेल्या कलाकारांना आजही आपण ऐकतो, म्हणजे त्यांनी नक्कीच काहीतरी 'ग्रेट' केलं आहे. पण त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे ती महान परंपरा तरुणांनीच जपली पाहिजे. शास्त्रीय संगीतात करियर करायचं असेल, तर वेळ देणं अतिशय गरजेचं आहे. सध्याच्या रिअॅलिटी शोजमधून संगीत शिकता येणार नाही, असं तो सांगतो. ते केवळ दिखाऊ आहे. खरोखर संगीत शिकायचं असेल, तर त्यासाठी साधना केली पाहिजे. शास्त्रीय संगीत जगवायचं असेल, तर तरुणांनी ते ऐकलं पाहिजे, असं तो सांगतो.
' सूर सिंगार समिती'ने आदित्यला 'ताल मणी' हा किताब बहाल केला आहे. याशिवाय अनेक पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आलं आहे. पुढील वषीर् तो स्वत:चा पहिला सोलो अल्बम लॉँच करणार आहे. संगीताला आयुष्य समपिर्त केलेल्या आणि गुरुंची शिकवण जपणाऱ्या आदित्यला पुढच्या प्रवासासाठी हवे आहेत केवळ रसिकांचे आशीर्वाद!
स्नेहल जोशी-कुळकर्णी

सेरेना, जोकोविचचे धुव्वाधार विजय

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 9:47 AM

न्यूयॉर्क - सेरेना विल्यम्स आणि नोव्हाक जोकोविच यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत तिसरी फेरी गाठताना धुव्वाधार विजय मिळविले. जोकोविचने अर्जेंटिनाच्या कार्लोस बर्लोक्‍यूविरुद्ध दोनच; तर सेरेनाने हॉलंडच्या मिशेला क्रॅंज्जेकविरुद्ध एकच गेम गमावला. सेरेनाने पहिल्या फेरीत दोनच गेम गमावले होते. सेरेनासमोर व्हिक्‍टोरिया अझारेन्काचे आव्हान असेल. "नंबर वन' कॅरोलिन वॉझ्नीयाकीनेही अरांता रुसविरुद्ध दोनच गेम गमावले.
जोकोविचने यंदाच्या मोसमात दोनच सामने गमावले आहेत. या स्पर्धेपूर्वी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती; पण आता त्याने विलक्षण तंदुरुस्ती पुन्हा कमावल्याचे दिसून आले. 74व्या स्थानावर असलेल्या बर्लोक्‍यूला पहिला गेम जिंकून खाते उघडण्यासाठी एक तास सहा मिनिटे इतकी दीर्घ वाट पाहावी लागली. बर्लोक्‍यू 28 वर्षांचा असून, त्याने 50व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. त्याचा खेळ अगदीच खराब झाला नाही; पण जोकोविचचा धडाकाच थक्क करणारा होता. त्याने बेसलाइनवरून वेग आणि अचूकता राखली. त्याची सर्व्हिस छान झाली; तसेच परतीचे फटकेही चांगले बसले. बर्लोक्‍यूने तिसऱ्या सेटमध्ये एक ब्रेक नोंदवून थोडाफार दिलासा दिला.
"व्यावसायिक टेनिसपटू...'
जोकोविच म्हणाला, ""आम्ही व्यावसायिक टेनिसपटू आहोत. आमच्यासमोर आव्हान असते आणि ते अर्थातच जिंकण्याचे असते. मी बर्लोक्‍यूला ओळखतो. तो चांगला तरुण आहे. तिसऱ्या सेटच्या मध्यास मला त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. तो कसून प्रयत्न करीत होता. लढाऊ खेळाबद्दल मला त्याचे कौतुक करावे लागेल.'' रॉजर फेडररने 93व्या स्थानावरील इस्राईलच्या ड्यूडी सेला याच्यावर 77 मिनिटांत मात केली. यानंतर त्याची क्रोएशियाच्या मरिन चिलीचशी लढत आहे.
81 "वीनर्स', चुकाही तेवढ्याच
सातव्या मानांकित फ्रान्सच्या गेल मॉंफीसचे आव्हान मात्र संपुष्टात आले. स्पेनच्या जुआन कार्लोस फेरेरोकडून तो पाच सेटमध्ये पराभूत झाला. पाच तास चाललेल्या लढतीत मॉंफीसने 21 बिनतोड सर्व्हिस केल्या. त्याने 81 "वीनर्स' मारले; पण टाळता येण्यासारख्या चुकासुद्धा (अनफोर्स्ड एरर्स) तेवढ्याच केल्या. फेरेरोने "लव्ह'ने सर्व्हिस राखत विजय साकार केला. त्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवीत दोन्ही खेळाडूंचे कौतुक केले.
निकाल ः महिला एकेरी ः सेरेना विल्यम्स वि.वि. मिशेला क्रॅज्जेक 6-0, 6-1. कॅरोलिन वॉझ्नीयाकी वि.वि. अरांता रूस 6-2, 6-0. व्हिक्‍टोरिया अझारेन्का वि.वि. जिसेला डुल्को 6-4, 6-3. एलेना यांकोविच वि.वि. एलेना डॉकीच 6-3, 6-4. फ्रान्सिस्का शियावोनी वि.वि. मिरीयाना ल्युचीच 6-1, 6-1. अँड्रीया पेट्‌कोविच वि.वि. जीए झेंग 3-6, 6-3, 6-3.
पुरुष एकेरी ः नोव्हाक जोकोविच वि.वि. कार्लोस बर्लोक्‍यू 6-0, 6-0, 6-2. रॉजर फेडरर वि.वि. ड्यूडी सेला 6-3, 6-2, 6-2. मरिन चिलीच वि.वि. बर्नार्ड टॉमीच 6-1, 6-0, 6-2. जुआन कार्लोस फेरेरो वि.वि. गेल मॉंफीस 7-6 (7-5), 5-7, 6-7 (5-7), 6-4, 6-4. मार्डी फिश वि.वि. मॅलेक जझिरी 6-2, 6-2, 6-4. टोमास बर्डीच वि.वि. फॅबिओ फॉग्नीनी 7-5, 6-0, 6-0. ज्यो-विल्फ्रीड त्सोंगा वि.वि. सर्जी बुब्का ज्युनिअर 6-3, 7-5, 6-2.
6-0, 6-0, 6-0 विजय
ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पुरुष एकेरीत एकही गेम न गमावता विजय मिळविण्याचा पराक्रम यापूर्वी स्पेनच्या सर्जी ब्रुगेराने केला होता. फ्रान्सच्या थिएरी चॅंपीयनवर त्याने 6-0, 6-0, 6-0 अशी मात केली होती. जोकोविचचा हा विक्रम थोडक्‍यात हुकला.

साईना नेहवालचे आव्हान संपुष्टात

टोकियो - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिची जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी घोडदौड शनिवारी खंडित झाली. उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आठव्या मानांकित जर्मनीच्या ज्युलियन श्‍नेक हिने चतुर्थ मानांकित साईनावर 21-19, 21-10 अशी मात केली. साईनाच्या पराभवामुळे या स्पर्धेच्या एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
साईना विरुद्ध ज्युलियन हा सामना 39 मिनिटे चालला. पहिल्या गेममध्ये साईनाने चांगली लढत दिली. सुरवातीपासून दोन्ही खेळाडूंची बरोबरीच होती. मात्र, 19-19 असे गुण झाले असताना ज्युलिअनने सलग दोन गुण जिंकत पहिला गेम आपल्या नावे केला. पहिल्या गेममध्ये चांगली लढत दिल्यानंतर दुसरा गेमही चुरशीचा होईल, असे वाटत होते. दुसऱ्या गेमच्या सुरवातीला दोघींचेही गुण सारखेच होते. पण 10-10 अशी बरोबरी असताना ज्युलिअनने
सलग अकरा गुण जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यामध्ये ज्युलिअनने नेटजवळ चपळाईने खेळ करत साईनाची दमछाक करण्यावरच भर दिला. याआधी साईना आणि ज्युलिअनमध्ये सात लढती झाल्या होत्या. त्यामध्ये साईनाने पाच विजय मिळविले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये प्रथमच साईनाला आठव्या मानांकित ज्युलिअनकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. साईना जागतिक क्रमवारीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
 खालावलेला फॉर्म चिंताजनक नाही साईनाची कामगिरी सध्या खालावली असली, तरीही त्यात चिंता करण्याचे काहीही कारण नाही, असे मत भारताचे प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ""गेल्या वर्षी तिची कामगिरी चांगली झाली होती. या वर्षी कामगिरी काहीसी खालावली आहे. पण तरीही यात चिंताजनक काही नाही. फॉर्ममध्ये नसूनही ती सहज उपांत्य फेरीपर्यंत धडक मारत आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर तिच्याशी संपर्क झालेला नाही. मात्र, सध्या तिच्याकडून अगदी किरकोळ चुका होत आहेत. थोड्याशा सरावाने या त्रुटी दूर होतील आणि साईना पुन्हा दर्जेदार कामगिरी करू शकेल.''

आफ्रिदीचं डोकं फिरलंयः दादा गांगुली

कोलकाता - शोएब अख्तरची बॉलिंग खेळताना सचिनचे पाय लटपटताना आपण पाहिलेत, असा दावा करणा-या शाहिद आफ्रिदीला ‘दादा’ सौरव गांगुलीनं एकाच वाक्यात उडवून लावलंय. आफ्रिदीचं डोकं फिरलंय, असा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’ हाणून दादानं हा विषयच मिटवून टाकलाय.
‘रावळपिंडी एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणा-या शोएब अख्तरचं 'काँट्रव्हर्शली युवर्स ' हे आत्मचरित्र भारीच वादग्रस्त ठरलंय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर माझी बॉलिंग खेळताना घाबरायचा, अशी गरळ शोएबनं आपल्या पुस्तकात ओकली होती. पण हे विधान त्याच्याच अंगाशी आलं होतं. सगळ्यांच रथी-महारथी क्रिकटपटूंनी त्याला अक्षरशः फोडून काढलं होतं. असं असताना, काल पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी त्याच्या पाठीशी उभा राहिला आणि शोएब बोलतोय त्यात तथ्य असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिली.
शोएबचा सामना करताना सचिनचे पाय अक्षरशः कापत असल्याचं मी फिल्डिंग करताना पाहिलंय, असा शाहिद आफ्रिदीनं केला होता. त्याबद्दल गांगुलीला विचारलं असता, आफ्रिदीचं डोकं फिरलंय अशी प्रतिक्रिया त्यानं दिली.
दरम्यान, भारताचा ऑफ स्पिनर हरभजनसिंगला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांतून वगळण्याचं ‘दादा’ ला फारसं आश्चर्य वाटत नाहीए. भज्जीच्या खराब फॉर्ममुळेच त्याला संघात स्थान मिळालं नसावं, असं त्यानं नमूद केलं. परंतु, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत हरभजशिवाय खेळणं शक्यच नसल्याचं सांगत त्यानं भज्जीच्या क्षमतेबद्दल विश्वास व्यक्त केला.
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger