Latest Post

Showing posts with label राष्ट्रीय. Show all posts
Showing posts with label राष्ट्रीय. Show all posts

आशा भोसलेंना अक्षय मोहंती सन्मान

Written By Admin on Monday, October 10, 2011 | 3:02 AM


भुवनेश्‍वर - प्रख्यात पार्श्‍वगायिका आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाच्या अतिशय प्रतिष्ठेच्या अक्षय मोहंती सन्मानसाठी निवड करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि कार्याचा गौरव करणारे विशेष पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रख्यात ओरिया गीतकार आणि संगीतकार अक्षय मोहंती यांच्या पुण्यतिथीनिमित्त येत्या १२ ऑक्टोबर रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यापूर्वी मन्ना डे, गुलजार आणि इलिया राजा यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
स्रोत: तरुण भारत, 10/9/2011 http://vrittabharati.in/

अडवाणी करणार दररोज ३०० किलोमीटर यात्रा

पटणा, १० ऑक्टोबर
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा ११ ऑक्टोबरपासून बिहारच्या छपरा जिल्ह्यातील सिताबदियारा येथून सुरू होणार आहे. या यात्रेदरम्यान अडवाणी दररोज ३०० किलोमीटर यात्रा करणार असून दररोज किमान तीन ठिकाणी ते जनसभेला संबोधित करणार आहेत.
अडवाणी यांच्या रथयात्रेला लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळ सिताबदियारावरून बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार हिरवी कंदिल दाखवणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात असणार्‍या या रथयात्रेदरम्यान अडवाणी भ्रष्टाचार, महागाई या मुद्यांबरोबरच विदेशात जमा असलेले काळे धन परत आणण्यावर भर देण्यात येणार आहे. अडवाणी आपल्या ४० दिवसांच्या यात्रेत २३ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १०० जिल्ह्यांना भेट देणार असल्याचे या यात्रेचे आयोजक रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.
स्रोत: तरुण भारत, 10/10/2011 http://vrittabharati.in/

अडवाणींचा सरकारवर पुन्हा हल्लाबोल


नवी दिल्ली - लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळावरून आपली रथयात्रा सुरू करण्यापूर्वी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
भ्रष्टाचारविरोधी रथयात्रा काढत असलेल्या अडवाणी यांनी युपीए सरकार भ्रष्टाचारासाठी जबाबदार असल्याचे सांगितले आहे. या सरकारच्या काळात लोकशाहीची हानी झाली असून सर्वत्र भ्रष्टाचार फोफावलेला दिसत आहे. हेच कारण आहे की देशातील जनतेत असंतोष व संताप भरलेला आहे. परदेशात असलेला काळा पैसा भारतात परत आणण्यात सरकारने जी निष्क्रियता दाखवली आहे त्यामुळे जनतेत या सरकारविषयीचा विश्‍वास कमी झाला आहे.
रथयात्रेपूर्वी दिल्लीत एका पत्रपरिषदेत बोलताना अडवाणी म्हणाले की रथयात्रेदरम्यान भ्रष्टाचाराच्या मुद्याबरोबरच महागाई, निवडणूक सुधारणा या मुद्यांवरदेखील भर देण्यात येणार आहे. काळा पैसासंदर्भात श्‍वेतपत्रिका जारी करण्याची मागणी करत रथयात्रेत विदेशातील काळा पैसा परत आणण्यासंदर्भात व यात गुंतलेल्या लोकांविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले.
स्रोत: तरुण भारत, 10/10/2011

गझल सम्राट जगजीतसिंह कालवश

 मुंबई - प्रख्यात गझल गायक जगजीतसिंह यांचे आज सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
जगजीतसिंह यांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या मखमली आवाजामुळे गझल गायकीत त्यांनी आपले स्थान निर्माण केले होते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही गाणे गायले होते.
जगजीतसिंह यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानच्या गंगानगरमध्ये झाला होता. बालपणीच त्यांना संगीताचा वारसा आपल्या वडिलांकडून मिळाला होता. १९६५ मध्ये ते मुंबईत आले आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला. आपल्या मेहनतीने त्यांनी चित्रपटसृष्टीत लवकरच आपले स्थान निर्माण केले. आपल्या गाण्याच्या शैलीने त्यांनी रसिकांना भुरळ घातली आणि रसिक त्यांच्या गाण्याचे दिवाने झाले. सामान्य माणसाला गझलची आवड जगजीतसिंह यांच्यामुळे निर्माण झाली. गझलसारखा कठीण उर्दूतला प्रकार त्यांनी रसिकांसाठी उलगडून दाखवला.
‘प्रेमगीत’, ‘अर्थ’ या चित्रपटातील गाणी कोण विसरू शकेल. त्यांनी अनेक गझल अलबम तयार केले. त्यांच्या प्रत्येक अलबमने यशाचे शिखर गाठले. आपल्या एकुलत्या मुलाच्या निधनाने कोलमडलेले जगजीतसिंह पुन्हा बळाने उभे राहिले आणि त्यांनी संगीतक्षेत्रात आपले संशोधन सुरू केले. त्यांचे संगीतक्षेत्रातील योगदान अमूल्य आहे.

गझल प्रकाराला सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय बनवण्यात जगजीतसिंह यांचे मोठे योगदान होते. त्यांनी ५० पेक्षा जास्त अलबममध्ये गाणी गायली आहेत. त्यात गझलचे प्रमाण जास्त आहे. तुमको देखा तो ये खयाल आया, होठों से छुलो तुम मेरा गीत अमर कर लो, वो कागज की कश्ती वो बारीश का पानी या त्यांच्या गझल फारच लोकप्रिय झाल्या. हिंदीबरोबरच त्यांनी पंजाबी, बांगला, उर्दू, गुजराती, सिंधी आणि नेपाळी भाषेत गाणी व गझल गायल्या आहेत. २००३ मध्ये भारत सरकारने कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्भूषण पुरस्काराने सन्मानित केले.


गझल गायकीला नवा आयाम देणार्‍या या सम्राटाला अभिवादन.
स्रोत: तरुण भारत, तारीख: 10/10/2011  http://vrittabharati.in/

आजपासून रिपाइंची नागपुरात राष्ट्रीय परिषद

Written By Admin on Monday, October 3, 2011 | 10:06 AM

नागपूर, २ ऑक्टोबर
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर उद्या ३ ऑक्टोबरपासून नागपुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची राष्ट्रीय परिषद व रिपब्लिकन महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार रामदास आठवले यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी उपस्थित राहणार आहेत. भीमशक्ती-शिवशक्तीच्या विभागीय मेळाव्यानंतर उद्या दुसऱ्यांदा भाजप-सेना आणि रिपाइंचे नेते एका व्यासपीठावर येणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाची स्थापना ३ ऑक्टोबर १९५७ ला नागपुरात झाली होती. त्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम रिपाइंने आयोजित केला असून तो दोन दिवस चालणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी ११.३० वाजता वसंतराव देशपांडे सभागृहात रिपब्लिकन महोत्सवाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ, रिपाइं नेते व माजी मंत्री प्रीतमकुमार शेगावकर, आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिपाइं, भाजप आणि सेनेचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आगामी विधानसभा आणि पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिवशक्ती-भीमशक्ती युती करण्यात आली आहे. नागपुरात गुरुवारी होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वर्धापन दिनाच्या पाश्र्वभूमीवर हा कार्यक्रम होत असून रिपाइंच्या व्यासपीठावर भाजप आणि सेनेचे नेते उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
उद्या सायंकाळी ५.३० वाजता ‘रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम व पुढील वाटचाल’ या विषयावर डॉ. कृष्णा किरवले(विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. ४ ऑक्टोबरला सकाळी ११.३० वाजता साई सभागृहात आठवले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय परिषद होणार असून त्यात देशभरातील पाचशे प्रतिनिधी सहभागी होतील, असे पक्षाचे सरचिटणीस भूपेश थुलकर यांनी कळवले आहे.   

शांती टिग्गा ठरली लष्करातली पहिली रणरागिणी!

नवी दिल्ली, २ ऑक्टोबर
रणांगणावर शत्रूशी थेट टक्कर देण्याची कामगिरी भारतीय लष्करात आजवर केवळ पुरुषांवरच होती. शांती टिग्गा या ३५ वर्षीय महिलेने मात्र स्वकर्तृत्व आणि स्वबळाच्या जोरावर लष्करात जवान म्हणून प्रवेश केला असून लष्करातली ती पहिलीच रणरागिणी ठरणार आहे!
प्रांतिक सेनादलाच्या ९६९ रेल्वे अभियांत्रिकी तुकडीतून शांतीने लष्करात प्रवेश केला आहे. ज्येष्ठ सेनाधिकाऱ्याने सांगितले की, केवळ अधिकारी पदांवर तसेच थेट लढाईशी संबंध येणार नाही अशा पदांवर आजवर महिलांना लष्करात प्रवेश होता. पण शांतीने शारीरिक क्षमतांच्या सर्व कसोटय़ात सरस ठरून १३ लाख जवानांचा समावेश असलेल्या लष्करात पाय रोवला आहे. दोन मुलांची आई असलेल्या शांतीने धावण्याच्या शर्यतीत आपल्या पुरुष स्पर्धकांपेक्षा पाच सेकंद आधीच दीड किलोमीटरचे अंतर कापले! अवघ्या १२ सेकंदात तिने ५० मीटरचे अंतर धावून पार केले. हा एक विक्रमच आहे.
पश्चिम बंगालच्या जलपयगुडी जिल्ह्य़ातून २००५ साली पॉइंटस्मन म्हणून शांती भारतीय रेल्वेत भरती झाली होती. पतीच्या निधनानंतर तिला अनुकंपा तत्त्वावर ही नोकरी मिळाली होती. पण तेवढय़ावर समाधानी न राहता शांतीने आणखी झेप घ्यायचे ठरविले. त्यातूनच गेल्या वर्षी तिने प्रांतिक लष्कराची परीक्षा दिली. लष्करात कोणत्याही महिलेने जवान म्हणून परीक्षा दिलेल्या नाहीत, हे तोवर तिला माहितही नव्हते. भरतीच्या प्रशिक्षणादरम्यान तिच्या नेमबाजीने व बंदूक हाताळण्याच्या कौशल्याने प्रशिक्षकही प्रभावित झाले.
लहानपणीच, लष्करात आपण भरती व्हावे, असे मला वाटे. जवानांचा लष्करी हिरवा गणवेषही मला घालावासा वाटे. माझे काही नातेवाईकही लष्करातच होते आणि त्यांच्यामुळे आपणही लष्करात जावे, असे मला वाटत असे. त्यामुळे शारीरिक क्षमतेसह सर्व परीक्षांत आपण अव्वल ठरले पाहिजे, या एकाच विचाराने मी झपाटले होते. त्यासाठी मी भरपूर सराव आणि मेहनतही केली, असे शांती हिने सांगितले.
भारतीय सेनादलांत महिलांचा प्रवेश प्रथम झाला तो वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून. लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातून सेनादलात १९६८ साली दाखल झालेल्या पुनीता अरोरा या लेफ्टनंट जनरल आणि नौदलाच्या व्हाइस अ‍ॅडमिरल या मानाच्या पदापर्यंत पोहोचलेल्या पहिल्या महिला अधिकारी होत्या. भारतीय वायुदलातही महिला वैमानिक दाखल झाल्या खऱ्या पण असे असले तरी महिलांचा समावेश हा अधिकारी पदापर्यंतच अधिकांश राहिला. थेट रणांगणावर महिलांची नियुक्ती भारतात आजवर झाली नव्हती.
जगभरात केवळ इस्रायल, कॅनडा आणि न्यूझिलंड या तीन देशांतच महिलांना सेनादलात थेट रणांगणावरही नियुक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे.

आंदोलनाला बिचकलेल्या कॉंग्रेसकडून अण्णांना 'राष्ट्रपती' पदाची ऑफर?

पुणे: भ्रष्टाचाराविरोधात सगळ्या देशाला एकत्र आणून आवाज उठवणारे ज्येष्‍ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना कॉंग्रेस सरकारकडून 'राष्ट्रपती' पदाची ऑफर दिली जाण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांना कॉंग्रेस सरकारने राष्‍ट्रपदी पदाची ऑफर दिली जाणार असल्याचे वृत्त एका स्थानिक दैनिकाने बुधवारी प्रसिध्द केले होते. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिध्दी या अण्णांच्या गावी सध्या अनेक बड्या राजकीय नेते हजेरी लावत आहेत. या पार्श्वभूमीवर अण्णांना कॉंग्रेसकडून ही ऑफर दिली जाणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
अण्णांना राष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती भवनात बसवून त्यांचे भ्रष्टाचारविरोधात सुरु असलेले आंदोलन चिरडून काढण्याची कॉंग्रेसची नवी खेळी आहे. परंतु, या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही.
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा कार्यकाळ पुढील वर्षी समाप्त होत आहे. राजधानी दिल्ली‍त कॉग्रेस नेत्यांच्या झालेल्या बैठकीत अण्णांना राष्ट्रपती पद देऊन त्यांची मनधरणी करावी. अण्‍णा हजारे हे राष्‍ट्रपती झाल्याने महाराष्ट्रातील जनता खुश होईल. आणि देशात एक चांगला संदेश जाईल. अशी कॉंग्रेसची  'आयडीया' आहे. विशेष म्हणजे कांग्रेस विरोधात असलेल्या देशातील जनतेलाही या माध्यमातून नियंत्रणात ठेवता येईल.
अण्णांना कॉंग्रेस सरकारकडून राष्‍ट्रपतीपदाची ऑपरचे वृत्त ही अफवा असल्याचे अण्णांचे सहाय्यक संजय पठाडे यांनी सांगितले. अण्णा कॉंग्रेसकडून आलेला असा कोणताही प्रस्ताव स्विकारणार नाहीत. अण्णा हजारे कॉंग्रेसच्या कोणत्याही मोहाला बळी पडणार नाहीत, असा विश्वास राळेगण सिध्दीचे  सरपंच जयसिंह मपारी यांनी व्यक्त केला आहे. कोणताही केंद्रीय मंत्री अण्णांकडे असा प्रस्ताव आणण्याचे धाडसही करणार नाही, असेही मपारी म्हणाले.

'लेटर बॉम्ब' माझा नाही - प्रणव

दिल्ली केंद्रीय अर्थ मंत्रालयाने टू जी स्पेक्ट्रमसंदर्भात पाठवलेले संबंधित पत्र खुद्द पंतप्रधान कार्यालयासह विविध मंत्रालये व न्यूज चॅनेल्स यांनी या प्रकरणी केलेल्या टिप्पणींचे सारांश होते व त्यात आपल्या व्यक्तिगत मताचा समावेश नव्हता , असे स्पष्ट करणारे ' नवे पत्र ' केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवले असून केंद्रीय गृहमंत्री पी . चिदंबरम यांच्याभोवतीचा वेढा वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलेला ' लेटर बॉम्ब ' फुसका ठरवण्याचा प्रयत्न अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केला .
'टूजी स्पेक्ट्रम घोटाळा तत्कालीन अर्थमंत्री चिदंबरम टाळू शकले असते ' अशी टिप्पणी असलेले पत्र अर्थ मंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवल्याचे नुकतेच आरटीआयअंतर्गत उघड झाले आहे . त्यावरून निर्माण झालेल्या रणकंदनामुळे यूपीएभोवती संशयाचे दाट धुके निर्माण झाले . या सर्व पार्श्वभूमीवर अर्थमंत्री मुखर्जी यांनी बुधवारी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रात वरील मत व्यक्त करत चिदंबरम यांना वेढ्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला .
प्रणव - पंतप्रधान - सोनिया भेट ?
टूजी प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादाला नवरात्रीच्या मुहूर्तावर तिलांजली देऊन यूपीएत सारे काही आलबेल असल्याची ग्वाही देशवासीयांना द्यावी यासाठी प्रणव मुखर्जी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटणार असल्याची चर्चा बुधवारी राजधानीत होती . पंतप्रधान व सोनिया गांधी यांच्यातही चर्चा होणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट होत होते . अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर प्रणव व पंतप्रधान यांची प्रत्यक्षात भेट झालेली नाही , हे विशेष !
पंतप्रधानांच्या जेवणावळीत चिदंबरम !
टू जीवरून महाभारत रंगले असतानाच गृहमंत्री पी . चिदंबरम यांनी मात्र बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला . ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्यासाठी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभात पंतप्रधानांनी मंत्रिमंडळातील दोनच सहकाऱ्यांना आमंत्रित केले होते . त्यात चिदंबरम यांचा समावेश होता . माहिती व प्रसारण मंत्री अंबिका सोनीही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या .
' सरकारच्या कमार् ' वरून हमरातुमरी
दरम्यान , टूजी प्रकरणावरून यूपीएला कोंडीत पकडण्याची संधी भाजपने बुधवारीही साधलीच . यूपीएला पाच वर्षांचा जनादेश आहे , या पंतप्रधानांच्या वक्तव्यावर ' हे सरकार आपल्या कर्मानेच पडणार आहे ' अशी प्रतिक्रिया सुषमा स्वराज व अरुण जेटली यांनी व्यक्त केली . काँग्रेसनेही त्यास चोख प्रत्युत्तर देताना टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाशी संबंधित सुब्रमण्यम स्वामींच्या याचिकेची सुनावणी कोर्टात सुरू आहे . स्वामींतर्फे जो युक्तिवाद केला जातो त्यातला शब्दही न बदलता भाजप प्रसिद्धीपत्रके तयार करते . कोर्टाने अद्याप कोणताही निकाल दिलेला नाही , त्यापूर्वीच भाजपला स्वत : चा काल्पनिक निकाल ऐकवायची घाई झाली असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी हाणला .

सीमा’शक्ती वाढविण्यावर भारताचा भर

स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर
चीन आणि पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती लद्दाख भागात आपली क्षमता वाढविण्याच्या दिशेने पावले उचलताना भारतीय हवाई दलाने लढाऊ आणि जड वाहतूक विमानांसाठी कारगिल आणि न्योमा येथील आपले हवाई अड्डे अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. न्योमा येथील हवाई अड्ड्याचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राऊन यांनी सांगितले.
या दोन्ही हवाई अड्ड्यांचे विस्तारीकरण आणि अद्ययावत करण्यामुळे हवाई दलाची संरक्षण आणि मारक क्षमता वाढणार आहे, असे सांगताना ते म्हणाले की, सर्वच प्रकारच्या विमानांच्या कार्यान्विततेसाठी कारगिल हवाई अड्ड्याचाही विस्तार करण्याची आमची योजना आहे. दरम्यान, हवाई दलातील प्रशिक्षणार्थी वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वीत्झर्लंडच्या कंपनीसोबत प्रशिक्षण विमानांच्या खरेदीचा १६५० कोटी रुपयांचा करार याच महिन्यात करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्राध्यक्षांनी वाहिली म. गांधींना पुष्पांजली

स्रोत: तरुण भारत
जिनेव्हा, २ ऑक्टोबर
म. गांधी यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी आज जिनेव्हा येथे त्यांना पुष्पांजली वाहिली. आज सकाळी येथील एरियाना पार्कमध्ये त्या गेल्या व तेथे असलेल्या म. गांधी यांच्या पुतळ्याला त्यांनी फुले वाहिली. तेथे असलेल्या लहान मुलांच्या एका गटाने यावेळी ‘राम धून’ म्हटली. यानंतर राष्ट्राध्यक्षांनी म. गांधी यांच्या पुतळ्याला परिक्रमा घातली. स्वित्झर्लंड व भारत यांच्यात झालेल्या मैत्री कराराला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १९९७ साली या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते. भारताच्या राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील स्वित्झर्लंड व ऑस्ट्रेलियाच्या आठ दिवसांच्या दौर्‍यावर येथे आल्या आहेत. भारताच्या स्वित्झर्लंडमधील राजदूत चित्रा नारायणन यांनी त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केेलेल्या स्वागत समारंभाला हजर राहिल्यानंतर त्या बर्नकडे रवाना होतील. चित्रा नारायणन् माजी राष्ट्रपती के आर नारायणन् यांची मुलगी आहे.

२जी प्रकरणी अनिल अंबानींना क्लीन चीट

स्रोत: तरुण भारत
नवी दिल्ली, ३ ऑक्टोबर
२जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अनिल अंबानी यांना सीबीआयने क्लीन चीट दिली आहे. स्पेक्ट्रम लायसन्स मिळालेल्या स्वान टेलिकॉम कंपनीला निधीच्या हस्तांतरप्रकरणी तसेच विविध कंपन्यांच्या पुनर्रचनेसंदर्भात अनिल अंबानींचा हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट करत सीबीआयने त्यांना क्लीन चीट दिली आहे.
सीबीआयने २९ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात अंबांनींविरोधात कोणताही ठोस पुरावा मिळाला नसल्याचे नमूद केले आहे. रिलायन्स एडीएजीचे स्वान टेलिकॉममध्ये ९.९ टक्के भागभांडवल आहे. तसेच टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स आघाडीची कंपनी असल्यामुळे स्वान टेलिकॉम परवान्यासाठी पात्र नव्हती.
याच घोटाळाप्रकरणी गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा आणि हरी नायर यांना अटक करण्यात आली आहे.

पुन्हा बाबा रामदेवांचा हल्लाबोल

स्रोत: तरुण भारत 
फारूखाबाद, ३ ऑक्टोबर
भ्रष्टाचार आणि विदेशात असणारा काळा पैसा परत आणण्यासाठी केंद्र सरकारच्या  निष्क्रियतेवर पुन्हा एकदा रामदेव बाबांनी हल्लाबोल केला आहे. जे लोक काळा पैसा परत आणण्यात बाधा आणत आहेत, त्यांचाच काळा पैसा या विदेशी बँकांमध्ये जमा असून शकतो, अशी टीका केंद्र सरकारवर रामदेव बाबांनी केली आहे.
‘भारत स्वाभिमान यात्रा’वर असणार्‍या रामदेवबाबांनी आज सकाळी योगशिक्षण दिल्यानंतर केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. काळा पैसा भारतात परत आणण्यामध्ये अडचणी आणणार्‍या लोकांचाच पैसा विदेशी बँकांमध्ये जमा असू शकतो. असे नसते देशाच्या विकासासाठी हा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असते.
भ्रष्टाचाराचा मुद्दा खूप मोठा असून या भ्रष्टाचारात अडकलेल्या मोठ्या लोकांची नावे आश्‍चर्यकारकपण समोर येत आहेत. भ्रष्टाचाराने देश पोखरत चालला आहे. देशात वाढणार्‍या महागाईचे कारणदेखील भ्रष्टाचारच आहे. निष्क्रिय लोकांच्या हाती देशाची सत्ता असल्याचेही बाबा रामदेव यांनी सांगितले.

२ जी मुद्याचा संपुआच्या स्थैर्यावर प्रभाव पडणार नाही - शरद पवार

Written By Admin on Sunday, October 2, 2011 | 9:17 AM

२ जी मुद्याचा संपुआच्या स्थैर्यावर प्रभाव पडणार नाही - शरद पवार
स्रोत: तरुण भारत
ठाणे, १ ऑक्टोबर - २ जी स्पेक्ट्रम परवाना वाटप घोटाळ्याचा जो वाद सध्या सुरू आहे त्यातील तथ्ये समोर मांडण्यासाठी केंद्र सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून या मुद्याचा कॉंगे्रसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील संपुआ सरकारच्या स्थैर्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी म्हटले आहे. खरे तर २ जी स्पेक्ट्रम प्रकरण वाजवीपेक्षा फुगवून दाखविण्यात येत असून यातील सत्य ज्यावेळी समोर येईल त्यावेळी प्रत्येकालाच त्यातील खरेपणा समजून येईल, असे पवार पुढे म्हणाले. हे प्रकरण लवकरात लवकर संपविण्यासाठी कॉंगे्रस पक्ष योग्य दिशेने प्रयत्न करीत आहे. केंद्रातील संपुआ सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नाही, हेही पवार यांनी स्पष्ट केले. राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या स्थानिक नेत्यांची तसेच कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवार येथे आले असता काल रात्री ते पत्रकारांशी बोलत होते. २ जी स्पेक्ट्रमवरून पी चिदम्बरम व प्रणव मुखर्जी यांच्यात सुरू असलेल्या वादासंदर्भात बोलताना पवार म्हणाले, हे संपूर्ण प्रकरण प्रसिध्दी माध्यमांनी वाजविपेक्षा फुगविले आहे.

तेलंगणाबाबत राष्ट्रीय स्तरावर चर्चेची आवश्यकता : आझाद

स्रोत: तरुण भारत
हैदराबाद, २ ऑक्टोबर
स्वतंत्र तेलंगणा निर्मितीच्या मुद्यावरून सध्या आंध्रप्रदेशात सुरू असलेल्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची केंद्रसरकारला जाणीव आहे. मात्र, तेलंगणाबाबत राष्ट्रीय स्तरावर आणखी चर्चा होण्याची गरज आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री आणि कॉंग्रेसचे आंध्रप्रदेश प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. कुठलीही कालमर्यादा निश्‍चित न करता या मुद्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे अनेक लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे, असे आझाद यांनी विजयावाडा आणि प्रकाशम जिल्ह्याच्या दौर्‍यावर रवाना होण्यापूर्वी येथील विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. आंध्रप्रदेश सरकारमधील स्वतंत्र तेलंगणा समर्थक कर्मचारी गेल्या १३ सप्टेंबरपासून संपावर आहेत. या कर्मचार्‍यांनी जनतेचे हित डोळ्यापुढे ठेवून ताबडतोब कामावर हजर व्हावे, असे आवाहन आझाद यांनी केले. आझाद, प्रणव मुखर्जी आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची शनिवारी दिल्लीत बैठक झाली होती.

सरकारची आत्महत्येकडे वाटचाल

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अडवाणी यांचा दावा
लोकसभेच्या मध्यावधीसाठी सज्ज राहण्याचे पक्षजनांना आवाहन


नवी दिल्ली, १ ऑक्टोबर
अनेक मोठमोठ्या घोटाळ्यांमध्ये आणि अंतर्गत कलहात अडकलेल्या केंद्रातील संपुआ सरकारची आत्महत्येकडे वाटचाल सुरू झालेली आहे. हे सरकार केव्हापर्यंत टिकेल, २०१४ पर्यंतचा कालावधी पूर्ण करेल काय, हे सांगता येणे कठीणच आहे. या सरकारचे भवितव्य अधांतरी असल्याने लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अटळ असून, पक्षाजनांनी मध्यावधीसाठी आतापासूनच स्वत:ला सज्ज ठेवायला हवे, असे भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केले. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना अडवाणी बोलत होते. केंद्रातील संपुआ सरकारने स्वत:च आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात अशी स्थिती आजवर कधीच कोणत्याही सरकारवर आलेली नाही. हे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. एक क्षणही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार या सरकारला नाही. नजिकच्या भविष्यात या सरकारचे काय होईल, याची कुठलीच हमी नसल्याने आपण निवडणुकीसाठी सज्ज राहायलाच हवे, असे मत अडवाणी यांनी व्यक्त केले. घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या मंत्र्यांना वाचविण्याशिवाय दुसरे कोणतेही काम या सरकारकडे राहिले नाही. हे सरकार पूर्णपणे निष्क्रिय झाले असून, देशभरातील नागरिक सरकारला कंटाळले आहे, असे अडवाणी म्हणाले. येत्या ११ ऑक्टोबरपासूनच्या आपल्या रथयात्रेचा उद्देश निवडणुका नसून, भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती निर्माण करणे हाच एकमेव उद्देश आहे. या सरकारवरून लोकांचा विश्‍वास उडाला आहे. हा विश्‍वास गमविण्यासाठी सरकारचे कर्मच कारणीभूत ठरले आहेत, असेही अडवाणही यांनी स्पष्ट केले. यावेळी संपुआ सरकारवर सडकून टीका करताना विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, देशभरातील जनता मोठ्या आशेने भाजपाकडे पाहात आहे आणि भाजपानेही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला सिद्ध करायला हवे. केवळ संपुआ सरकारमधील अस्थिरतेचा फायदा घेऊन निवडणुका जिंकता येणार नाही.तर, पक्षजनांनी तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करण्याची आणि त्यांचा विश्‍वास जिंकण्याची आवश्यकता आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणाले की, हे सरकार २०१४ पर्यंत टिकण्याची कुठलीही शक्यता नाही. वरिष्ठ मंत्र्यांमध्येच मतभेद निर्माण झाले आहे. एक मंत्री दुसर्‍याची हेरगिरी करीत आहे. अंतर्गत कलह इतका वाढला आहे की, सरकार केव्हा कोसळेल हे सांगणे फारच कठीण आहे.
 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2012. PRAJAWAANI - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger